
सर्व घटकांच्या विकासासाठी अमळनेर तालुका शहर विकास आघाडी कटिबद्ध.
अमळनेर :- नगरपरिषद निवडणुकीत प्रचार जोर पकडत असताना भावनिक वातावरण निर्माण करून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केला आहे. “रडून लोकांना भावनिक करणे ही जुनी क्लुप्ती आहे. अमळनेरकर या खोट्या अश्रूंना भुलणार नसून विकासासाठी शहर विकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन भागवात पाटील यांनी केले आहे.यावेळी त्यांनी सांगितले की,शहरात झालेल्या एका सभेत माजी आमदार चौधरी भावूक झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. परंतु मात्र भावनिक झालेला माणूस पुढच्याच मिनिटाला खळखळून हसताना दिसतो, हे अश्रू खरे की खोटे याबद्दल जनता जनार्दनच निर्णय घेईल,” असे पाटील म्हणाले. माजी आमदारांकडे शहराच्या विकासासाठी कोणतेही ठोस व्हिजन नसल्यानेच असे भावनिक प्रयोग सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. “नगरपरिषदेची सत्ता त्यांच्या हातात असताना कोणतीही ठोस विकासकामे झाली नाहीत. त्यामुळे जनतेने त्यांना अनेक वेळा नाकारले आहे. मागील ५ वर्षात शहर विकास आघाडीच्या तसेच आमदार निधीच्या माध्यमातून केलेल्या कामांचा आणि आगामी कार्ययोजनेचा स्पष्ट आराखडा असल्यानेच अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीला जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचा दावा भागवत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पक्ष शहरात विकासाच्या दृष्टीने एकत्र आले असून अमळनेर शहर विकास आघाडीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर तसेच १८ प्रभागातील सर्व उमेदवारांच्या नावासमोरील शिट्टी चिन्हाचे बटण दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन भागवत पाटील यांनी केले आहे.








