
अमळनेर | अटकाव न्यूज:
अक्षय तृतीया व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अमळनेर येथे आयोजित कार्यक्रमात “बालविवाह मुक्त भारत” या राष्ट्रीय अभियानाला भक्कम पाठिंबा देत आमदार मा. अनिल दादा पाटील यांनी समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना सतर्क राहून बालविवाह रोखण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
आमदार पाटील म्हणाले की, “बालविवाह रोखणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. धर्मगुरु, सामाजिक संस्था, पालक, स्थानिक समित्या आणि प्रशासनाने एकत्र येऊन हा समाजाला लागलेला कलंक दूर करणे आवश्यक आहे.”
‘जस्ट राईट फॉर चिल्ड्रन’ प्रकल्पाचा पुढाकार:
आधार बहुउद्देशीय संस्था जळगाव जिल्ह्यात राबवत असलेल्या ‘जस्ट राईट फॉर चिल्ड्रन’ या प्रकल्पाच्या अंतर्गत ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात अमळनेरचे आमदार अनिल दादा पाटील यांनी सक्रीय सहभाग घेतला. त्यांनी संपूर्ण अमळनेर तालुक्यातील नागरिकांना बालविवाह निर्मूलनासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती:
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे, पोलीस उपविभागीय अधिकारी विनायक कोते, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, शहर तलाठी आबा सोनवणे, ॲड. तिलोत्तमा पाटील, माजी नगरसेवक मनोज पाटील, दीपक पाटील, नरेंद्र संदानशिव, प्रताप शिंपी, राष्ट्रवादीचे मुख्तार खाटीक, इम्रान खाटीक, बाळू पाटील, अनिल शिसोदे आणि नगावचे माजी सरपंच महेश पाटील यांचा समावेश होता.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग:
या अभियानात आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील, संचालक रेणू प्रसाद, प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मोहिनी धनगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.
हा उपक्रम केवळ एक दिवसाचा नसून, याला दीर्घकालीन स्वरूप द्यावे लागेल, असे आवाहन कार्यक्रमाच्या शेवटी करण्यात आले.
बालविवाह हा गुन्हा आहे याची जाणीव समाजाला करून देत, सर्वांनी मिळून पुढाकार घेतला तरच बालविवाह मुक्त भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकते, असा विश्वास या उपक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.
