
अमळनेर : अमळनेर शहराचे पर्यावरणीय वैभव असलेल्या अंबर्षी टेकडीला अचानक आग लागल्याने सुमारे २५ हजार झाडे जळून खाक झाली आहेत. ही घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. सुमारे साडे तीन तास आगीचे तांडव सुरू होते, त्यामुळे पर्यावरणाला मोठी हानी झाली आहे. या भागात यापूर्वीही ८ ते १० वेळा आगी लागून नुकसान झाले असल्याचे पर्यावरणवादी सांगतात.
आगीचे विझवण्यासाठी प्रशासन व नागरिकांचे अथक प्रयत्न
अचानक आग लागल्याची माहिती मिळताच मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी तत्काळ अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी तसेच कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, जफर पठाण, मच्छींद्र चौधरी, सत्येंन संदानशिव, आकाश संदानशिव, भिका संदानशिव आणि आकाश बाविस्कर यांना दोन मोठे व एक लहान बंब आणि आरोग्य विभागाचे ट्रॅक्टर घेऊन घटनास्थळी पाठवले. अग्निशमन दलाचे कर्मचारी पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न करत होते, तर अंबर्षी टेकडी ग्रुपचे सदस्य आणि महिला हाऊसिंग ट्रस्टच्या महिलांनी देखील शर्थीचे प्रयत्न करून मदत केली. सर्वांच्या अथक प्रयत्नांनंतर सुमारे साडे तीन तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले.
विनाशाच्या छायेत पर्यावरण
आग हनुमान टेकडीकडील भागात लागल्याचे समजताच ती पसरत जाऊन नक्षत्र वन, अमृत वन, रोटरी वन आणि आयएमए वन जळून खाक झाले. ११११ गटातील काही भाग देखील या आगीत बेचिराख झाला. टेकडीवर सुमारे ४५ हजार झाडे लावण्यात आली होती आणि या भागात वनसंपदा विकसित झाली होती. अनेक पक्षी, प्राणी आणि सरपटणारे जीव येथे आश्रय घेत होते. जमिनीची धूप थांबवण्यासाठी तसेच प्राणी आणि पक्ष्यांचे घरटे सुरक्षित ठेवण्यासाठी गवत तसेच ठेवण्यात आले होते. मात्र, या आगीत सुमारे २५ हजार झाडे नष्ट झाल्याने टेकडीचा ५० ते ६० टक्के भाग जळून खाक झाला आहे.
समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी
अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ‘टेकडी ग्रुप’ निर्माण केला असून, त्यांनी प्रचंड मेहनतीने या झाडांचे संगोपन केले आहे. त्यांच्या कार्याला खरोखरच सलाम करावा लागेल. मात्र, या ठिकाणी वारंवार लागणाऱ्या आगीमुळे समाजकंटकांचा वावर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या आगीच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे.
निसर्गाच्या रक्षणासाठी जनसहभागाची गरज
अंबर्षी टेकडीचे संवर्धन करण्यासाठी शहरातील अनेक नागरिकांनी योगदान दिले आहे. ‘टेकडी ग्रुप’ नियमित देखभाल करत असतो. मात्र, वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे त्यांचे परिश्रम वाया जात आहेत. यापुढे अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. तसेच, नागरिकांनीही पर्यावरण संवर्धनासाठी अधिक सजग राहावे आणि निसर्गाच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
