Search
Close this search box.

अमळनेर शहरातील वेश्या वस्तीवरून संघर्ष: महिला स्थलांतरास विरोध करत, अनेक आरोप समोर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर: सध्या अमळनेर तालुक्यात मोठ्या चर्चेचा विषय ठरलेली वेश्या वस्ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काही नागरिक या वस्तीला शहरातून हटवण्याची मागणी करत असताना, काहींनी यांना गावाबाहेर स्थलांतरित करण्याचा पर्याय सुचवला आहे. मात्र, या वस्तीतील महिलांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडत, “आम्ही गेली दीडशे वर्षे येथे आहोत, आम्ही कुठेही जाणार नाही,” असा ठाम निर्णय जाहीर केला आहे.

वेश्या वस्तीचा इतिहास आणि सध्याची परिस्थिती

अमळनेर शहरात ही वस्ती नवीन नाही, तर सुमारे दीडशे वर्षांपासून येथे आहे. पूर्वी येथे “मुजरा” हा पारंपरिक कलाप्रकार सादर केला जायचा. मात्र, कालांतराने हा प्रकार बंद पडला आणि त्यानंतर येथे वेश्या व्यवसाय सुरू झाला. त्या काळात शहराच्या सीमारेषेच्या बाहेर असलेल्या या भागाभोवती हळूहळू लोकांची वस्ती वाढली आणि आता हा भाग शहराच्या मध्यवर्ती भागात आला आहे.

महिलांचे आरोप: धमक्या आणि खंडणी मागणी

या वस्तीतील महिलांनी सांगितले की, काही लोक त्यांच्या जागेवर डोळा ठेवून आहेत आणि त्यांना हटवण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. तसेच काही लोकांकडून खंडणी मागितली जात असून, “जर येथे राहायचे असेल, तर आम्हाला पैसे द्या” असे सर्रास सांगितले जात असल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे. काहींनी तर थेट त्यांच्या मालमत्तेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगितले आहे.

HIV चाचणी आणि आरोग्य तपासणीबाबत खुलासा

काही समाजकंटकांनी या वस्तीमुळे अमळनेर शहरात HIV संसर्ग वाढत असल्याचा आरोप केला होता. यावर महिलांनी प्रत्युत्तर देत सांगितले की, त्यांची दर 1 ते 3 महिन्यांत एकदा HIV चाचणी केली जाते. यासोबतच शासकीय आरोग्य पथकदेखील वेळोवेळी तपासणीसाठी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“आमच्यामुळे बलात्कार आणि अत्याचार टळतात”

या महिलांनी आणखी एका मुद्द्याकडे लक्ष वेधले. समाजातील काही विकृत मानसिकतेच्या नराधमांकडून महिलांवर वारंवार अत्याचार केले जातात. अशा परिस्थितीत त्यांचा व्यवसाय अस्तित्वात असल्यामुळे अन्य स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार काही प्रमाणात रोखले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, अल्पवयीन मुली आणि वृद्ध महिलादेखील आज सुरक्षित नाहीत, मात्र त्यांच्या अस्तित्वामुळे काही प्रमाणात या घटनांमध्ये अडथळा निर्माण होतो, असेही त्यांनी नमूद केले.

“आम्ही कुठेही जाणार नाही!” – महिलांचा निर्धार

वेश्या वस्तीतील महिलांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “गेली दीडशे वर्षे आम्ही येथे आहोत, आता आम्हाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही आमच्या हक्काच्या जागेवर आहोत, आम्ही कुठेही जाणार नाही.”

समाजाचा अंतःविरोध आणि प्रशासनाची भूमिका

अमळनेर शहरातील काही नागरिकांना या वस्तीमुळे अडचण वाटते, तर काहीजण महिलांच्या बाजूने उभे आहेत. प्रशासकीय स्तरावर काय भूमिका घेतली जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु, या संपूर्ण प्रकरणावर प्रशासनाने योग्य तो तोडगा काढावा आणि महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें