![](https://atkavnews.com/wp-content/uploads/2024/02/img-20240221-wa00803417577661167318629-1024x682.jpg)
केंद्रीय जल आयोगाचे चेअरमन वोहरा यांचे मंत्री अनिल पाटलांना आश्वासन, दिल्ली येथे झाली सकारात्मक बैठक
अमळनेर-जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी पाडळसे धरणास लवकरच केंद्रीय जलआयोगाची मान्यता देण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय जल आयोगाचे चेअरमन कुशवेंद्र वोहरा यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांना दिल्ली येथे झालेल्या बैठकीत दिले.
धरणाचा पुढील मार्ग सुकर होण्याच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक अशी ही बैठक झाली.पाडळसे धरणाची चौथी सुप्रमा राज्य शासनाकडून मंजूर केल्यानंतर पुढील निधीच्या पूर्ततेसाठी सतत दिल्लीच्या संपर्कात असलेले मंत्री अनिल पाटील यांनी दिल्ली गाठून केंद्रीय जल आयोगाचे चेअरमन कुशवेंद्र वोहरा यांची भेट घेतली. अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये करण्यासंदर्भात प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर आहे.या प्रस्तावाच्या मंजुरीबाबत त्यांच्याशी चर्चा करत धरणाचे महत्व व गरज विशद केली. यावेळी श्री वोहरा यांनीही या प्रस्तावास केंद्रीय जल आयोगाची मान्यता लवकरात लवकर प्रदान केली जाईल असे आश्वासित केले.सदर बैठकीस केंद्रीय जल आयोगाचे वरिष्ठ अधिकारी व मुख्य अभियंता उपस्थित होते.
![](https://atkavnews.com/wp-content/uploads/2024/02/img-20240210-wa00183960029613402055515.jpg)