मयत अक्षयच्या कुटुंबियास मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत द्या

मंत्री अनिल पाटील यांचे मुख्यमंत्रीना विनंती पत्र,घटनेची चौकशी करण्याचीही मागणी

अमळनेर: मुंबईत बाळेगाव कॅम्प येथे पोलीस भरती दरम्यान मयत झालेल्या अमळनेर येथील अक्षय बिऱ्हाडेच्या कुटुंबियास मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत द्यावी या मागणीचे विनंती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती पत्र देऊन केली आहे.तसेच उपचारा दरम्यान डॉक्टरांचा हलगर्जीपणा असल्यास चौकशीची मागणीही आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की स्व. अक्षय मिलींद बि-हाडे, रा. प्रबुध्द कॉलनी, स्टेशन रोड, ता. अमळनेर जि. जळगाव हा एसआरपीएफ भरती प्रक्रीयेदरम्यान राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ११, नवी मुंबई कँप, बाळेगाव, जि. ठाणे-४०० २१६ येथे मैदानी चाचणी सुरु असताना चक्कर येऊन पडल्याने छत्रपती शिवाजी हॉस्पीटल, कळवा जि. ठाणे या रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान दि.२९ जून रोजी दुर्दवी मृत्यू झाला आहे.
मयत अक्षय चे वडील मिलींद बि-हाडे यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असून कुटूंबातील एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांच्या कुटूंबावर दुखाःचा डोंगर कोसळलेला आहे. तरी मिलींद बिऱ्हाडे यांना आर्थिक मदतीची आवश्यकता असून, मुख्यमंत्री सहायता निधीमधून विशेष बाब म्हणून लवकरात लवकर मदत मिळावी अशी विनंती मंत्री पाटील यांनी केली आहे.

डॉक्टरांचा हलगर्जीपणा असल्यास कारवाईची मागणी सदर घटनेत अक्षयच्या उपचारादरम्यान डॉक्टरांकडुन हलगर्जीपणा झाला असल्यामुळेच अक्षयचा मृत्यू झाला आहे असे त्याच्यासोबत रुग्णालयात असलेल्या कुटुंबियांचे म्हणणे असल्याने व याबाबत मंत्री अनिल पाटील यांच्याकडे तशी तक्रार प्राप्त झाल्याने या तक्रारीची चौकशी करून दोषी असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करावी व्हावी अशी विनंती मंत्री अनिल पाटील यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी पत्र देऊन केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *