चोपडा येथील दुहेरी खूनप्रकरणी पाच जणांना जन्मठेपेची तर वकिलासह दोघांना पाच वर्षे शिक्षा

चोपडा शहरातील दुहेरी खूनप्रकरणी पाच जणांना जन्मठेपेची तर वकिलासह दोघांना पाच वर्षे शिक्षा

अमळनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अमळनेर : चोपडा शहरातील प्रेमी युगुलाच्या खून प्रकरणी मुलीच्या भावांसह पाच जणांना अमळनेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सोमवार दि. १ एप्रिल रोजी सुनावली आहे. तर वकिलासह एकाला पाच वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या खटल्यात एकूण २१ साक्षीदार तपासण्यात आले.

चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयत वर्षा समाधान कोळी आणि राकेश संजय राजपूत यांच्यात दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधाच्या माहिती मिळाल्यावरून संशयित आरोपी हे मुलीला वारंवार सांगायचे की, सदर मुलगा राकेश हा दुसऱ्या समाजाचा असल्यामुळे त्याच्याशी प्रेम संबंध तोडून टाकावे. मात्र त्यावरून त्यांच्या घरात नेहमी वाद होत होते. दि. १२ ऑगस्ट २०२२ रोजी मयत राकेश राजपूत हा संशयित आरोपीच्या घरी रात्री आठ वाजता आल्याने व तो वर्षा कोळी हिच्याशी प्रेमसंबंध बाबत बोलू लागल्याने त्याचा संशयित आरोपींना राग आला.

त्यांनी त्याला जाब विचारला. त्यावरून वाद झाला. यावेळी संशयीतांनी वर्षा कोळी व राकेश राजपूत दोघांनाही दुचाकीवर बसवून चोपडा शहराजवळील नाल्याजवळ नेले. तेथे राकेश राजपूत याला बंदुकीने गोळी झाडून त्याचा खून करण्यात आला तर वर्षा कोळी ही प्रतिकार करीत असताना तिला देखील जागीच पकडून गळा दाबून हत्या करण्यात आली. यानंतर चोपडा शहर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात पोलिसांचा तपास सुरू होता संशयित आरोपींनी पुरावा देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अमळनेर न्यायालयात दाखल खटल्यात २१ साक्षीदार तपासण्यात आले.

विशेष म्हणजे संशयित आरोपींनी गुन्हा केल्यानंतर वकील नितीन मंगल पाटील यांच्याकडे जाऊन खुणाबाबत सल्ला घेतला. खून करणे, खुनाची तयारी करणे तसेच पुरावा नष्ट करणे असे विविध प्रकारचे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते. तसेच एकमेकांसोबत झालेल्या संभाषणाच्या सीडीआर रिपोर्ट व एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तसेच पिस्टल मधील गोळी या सर्व पुराव्यानुसार न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला. तपासाअधिकारी डीवायएसपी ऋषिकेश रावले, नाशिकचे वैद्यकीय अधिकारी आर. के. गढरी, मयत राकेश राजपूत याची आई मिनाबाई संजय राजपूत तसेच इतर पुराव्यानुसार अमळनेर न्यायालयाने संशयित आरोपींना शिक्षा ठोठावली आहे.

जिल्हा न्यायाधीश २ पी. आर. चौधरी यांच्यासमोर खटल्याचे कामकाज चालले. सरकारी वकील एड. किशोर बागुल यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात तुषार आनंदा कोळी (वय वर्ष २३), भरत संजय रायसिंग (वय वर्ष २२), बंटी उर्फ शांताराम अभिमान कोळी (वय १९), शांताराम अभिमान कोळी (वय ५६) रवींद्र आनंदा कोळी (वय वर्ष २०) यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा तसेच प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच संशयित आरोपी पवन नवल माळी आणि वकील नितीन मंगल पाटील यांना पाच वर्षे शिक्षा आणि एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा अशी शिक्षा ठेवण्यात आली आहे.

खटल्या कामी पैरवी अधिकारी ए. एस. आय. उदयसिंग साळुंखे ,पोहेको हिरालाल पाटील, नितीन कापडणे, राहुल रणधीर, विशाल तायडे आदींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]