नवलनगरजवळ कार पुलाखाली कोसळल्याने अमळनेरचे तीन ठार, चार जखमी

गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून येत होते घरी

अमळनेर : नाशिकडून अमळनेरकडे भरधाव वेगाने जाणारी चारचाकी धुळे तालुक्यतील नवलनगर जवळील छोट्या पुलाखाली कोसळून झालेल्या अपघातात अमळनेरचे तीनजण ठार झाले. तर चारजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास झाला. सरलाबाई पंडीत पाटील (वय ४५), मीनाबाई राजेंद्र पाटील (वय ५०), व शाहू विजय पाटील (वय १०, सर्व रा.अमळनेर) अशी मयतांची नावे आहेत.
नाशिक येथून गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून पाटील परिवार कारने (क्र.एमएच ०४-एफझेड३६८९) अमळनेरकडे येत होता. कारमध्ये जवळपास सात ते आठ जण होते. वेगाने येणारी कार फागणे-अमळनेर रस्त्यावरील नवलनगर गावाजवळ असलेल्या एका मोरी पुलावरून खाली कोसळली. अपघात एवढा भीषण होता की, कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात कारमधील चार जण जखमी झाले आहेत. ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना रूग्णवाहिकेतून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक अनिल महाजन व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत धुळे तालुका पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

[democracy id="1"]