तापमानात लवकरच वाढ होणार, हवामान विभाग …

येत्या सोमवार पर्यंत राज्यातील थंडी कमी होऊन किमान व कमाल तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी आहे. मात्र,आता उत्तरेतील पश्चिम चक्रावाताचा प्रभाव कमी होत आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत थंडी कमी होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
मध्य महाराष्ट्रात थंडी टिकून
मध्य महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात थंडी टिकून आहे. उर्वरित राज्यात मात्र गारठा कमी झाला आहे. आज मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट होईल. तर, विदर्भ, कोकणासह मराठवाड्याच्या तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्याच्या कमाल तापमानातही वाढ होत आहे. राज्यभरात तापमानाचा पारा 27 ते 35 अंशांच्या आसपास आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 34.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर, आज राज्यातील नीचांकी 8 अंश सेल्सिअस तापमान धुळे येथे नोंदवले गेले आहे. निफाड येथे 9 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. मध्य महाराष्ट्र वगळता राज्याच्या उर्वरित भागात बहुतांशी ठिकाणी तापमान 14 अंशांच्या वर गेल्याने गारठा कमी झाला आहे.

पश्चिमी चक्रावातामुळे हिमालय पर्वत व लगतच्या परिसरात होत असलेली हिमवृष्टी होत आहे. मात्र उत्तर भारतातील राज्यात थंडी काहीशी कमी झाली आहे. मात्र, उत्तरेतील थंडीचा परिणाम महाराष्ट्रात जाणवणार नाही, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. उत्तरेकडून आपल्याकडे झेपावणार्‍या थंड वाऱ्याला च्रक्रीय वाऱ्यामुळे रोध तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवत नसल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे