
अतिवृष्टीग्रस्त गावांना दिली भेट,नुकसान झालेल्या शेतीची केली पाहणी
अमळनेर: तालुक्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल त्यांचे तातडीने पंचनामे करा आणि ज्या शेतकऱ्यांचे खरेच नुकसान झाले असेल ते वंचित राहायला नको तेवढी काळजी घ्या अश्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतीच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
ग्रामिण भागातील शिरूड परिसरातील गावात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने मंत्री अनिल पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.यावेळी महसूल विभागाचे नायब तहसीलदार, तलाठी, कर्मवीर व ग्रामस्थ उपस्थित होते. तालुक्यातील शिरूड, लोंढवे, निसर्डी, वाघोदे येथे दि 17 जून रोजी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने शेकडो एकर शेती पाण्यात गेली होती व त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.यासंदर्भात मंत्री ना अनिल पाटील यांनी आधीच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर मा.जिल्हा परिषद सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांनीही वरील गावांमध्ये भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती,त्यानंतर मंत्री पाटील हे मुंबई येथून अमळनेर येथे येताच त्यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन समस्त शेतकऱ्यांना धीर दिला व लवकर पंचनामा करून शासकीय मदत मिळऊन देण्याची हमीही दिली.यावेळी माजी सभापती श्याम अहिरे,प्रा सुरेश पाटील, लोंढवे सरपंच अशोक पाटील,बन्सीलाल भागवत,योगेश भागवत यासह कार्यकर्ते उपस्थित होते.