महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे धरणे आंदोलन
अमळनेर: एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत राज्यासह देशात सुमारे २४ लाख अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका गेली अनेक वर्षे कुपोषण मुक्त करण्यासाठी अल्पशा मानधनावर अविरतपणे काम करीत आहेत. केंद्र सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सन २०१८ पासून कोणतीही मानधन वाढ दिलेली नाही.महागाई प्रचंड वेगाने वाढत चालली आहे.परंतु महागाईनुसार मानधनात वाढ झालेली नाही आणि इतरमागण्यांकडे सततपणे दुर्लक्ष केले आहे.म्हणून राज्यासह देशात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी केंद्र सरकारवर प्रचंड नाराज आहेत. देशातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नमुद मागण्या केंद्र शासनाने तातडीने सोडवाव्यात यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे दि.२२ डिसेंबर २०२३ रोजी दिल्ली येथील जंतर मंतर येथे देशव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
- मागण्या
- १) अंगणवाडी कर्मचारी यांच्या कामाचे आठ तास मोजून त्यांना किमान वेतन लागू करावे.
- २) एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या निधीत कपात करण्यात येऊ नये.
- ३) अंगणवाडी केंद्र खाजगी संस्थांना दत्तक देण्याची आणलेली योजना तातडीने रद्द करावी.
- ४) अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवसमाप्ती नंतर दरमहा पेन्शन लागू करावी.
- ५) अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महागाईचा विचार करून मानधनात भरीव वाढ करावी.
- ६) एकात्मिक बाल विकास सेवा योजना कायम करण्यात यावी.
यासह अन्य प्रलंबीत मागण्यासाठी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश,हरियाणा,राजस्थान, गोवा, मध्य प्रदेश,दिल्ली,गुजरात या राज्यांतील अंगणवाडी कर्मचारी माया परमेश्वर(महाराष्ट्र),शहीदा खान(राजस्थान),चंदा यादव (उत्तर प्रदेश),पार्वती आर्य (मध्य प्रदेश) यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन आहेत.
सदर आंदोलनात वरील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह महाराष्ट्रातून सुमारे दोनशे प्रतिनिधी भागीदारी करणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील आणि युवराज बैसाने यांनी दिली आहे.