मिळालेल्या संधीचे सोने म्हणून येत्या दीड ते दोन वर्षात पाडळसरे धरणाचे काम पूर्णत्वास आणणार

मा.ना.अनिल दादा यांनी दिली जनतेला ग्वाही

अमळनेर :-गेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने आशीर्वाद दिले नसते तर आजचा दिवस उगवला नसता यामुळे हे मंत्रीपद जनतेला समर्पित असून मिळालेल्या संधीचे सोने म्हणून कोणत्याही परिस्थितीत पाडळसरे धरणाचे काम येत्या दीड ते दोन वर्षात पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही ना.अनिल पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना दिली.
धरणाच्या कामासाठी सर्व तांत्रिक अडचणी मी आधीच दूर केल्या असून येत्या एक दोन मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4881 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, त्यानंतर केंद्र सरकार कडून मोठा निधी आणून धरण पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली. याचवेळी बोलताना अजित दादांनी २०१९ मध्ये घेतलेल्या निर्णयात माझाही वाटा होता हे तुम्ही पाहिले होते मात्र त्यावेळी वरिष्ठ नेत्यांनी रिव्हर्स गियर टाकल्याने माघारी फिरावे लागले ही वस्तुस्थिती आहे असा खुलासा देखील मंत्री पाटील यांनी केला. पुढे ते म्हणाले की २०१९ ला जरी माघारी फिरावे लागले तरी सत्तेत आलो आणि अडीच वर्षात निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाला गती मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस रसातळाला चालला असल्याने पक्षाला उभारी द्यायची असेल तर नवीन दमाच्या नेतृत्वाची गरज आहे म्हणून जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष सह सर्व पदाधिकारी नव्याने नियुक्त केले जातील असे सांगून त्यांनी पक्षात भाकरी फिरवण्याचे संकेत दिले.
यावेळी माजी आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, माजी जि.प.सदस्य जयश्री पाटील, विनोद देशमुख, मार्केट सभापती अशोक आधार पाटील, संचालक डॉ.अशोक पाटील, आर.के.पटेल उद्योग समूहाचे विनोदभैया पाटील, ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवडचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, प्रा.सुरेश पाटील, विनोद कदम मुक्तार खाटीक, खा.शि.मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख,ॲड.यज्ञेश्वर पाटील, विवेक पाटील, राजेश पाटील, शिवाजीराव पाटील यासह असंख्य कार्यकर्ते हजर होते. सूत्रसंचालन संजय पुनाजी पाटील यांनी केले.

[democracy id="1"]