अमळनेर – राज्यातील बारावीच्या १४,५७,२९३ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी १४ लाख ५७ हजार २८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. सीबीएसई, आयसीएसईचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकना ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कुठे पाहाल निकाल?
बारावीचा ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) http://hsc.mahresults.org.in
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.