रामकृष्ण.बी.पाटील, राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना
अमळनेर: राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने अनेकदा बैठकांमध्ये मानधन वाढीबाबत आश्वासने देऊनही मानधनवाढीचा कोणताही ठोस निर्णय शासनाने घेतलेला नाही. म्हणून राज्यातील अंगणवाडी कर्मचारी दि.१८ ते २२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आहार वाटपाव्यतिरिक्त कोणत्याही स्वरूपाचे काम करणार नाहीत सदर काळात शासनाने मानधनवाढ केली नाही तर दि.२३ फेब्रुवारी २०२३ पासून राज्यभर संपूर्ण असहकार आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
असहकार आंदोलनाच्या दरम्यान अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका ह्या *अंगणवाडी केंद्राचे कोणतेही काम करणार नाहीत,कोणतीही माहिती सादर करणार नाहीत,बैठका तसेच प्रशिक्षणास उपस्थित राहणार नाहीत.* अशी नोटीस शासनाला संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
प्रमुख मागण्या….
१) दि.१२ जानेवारी रोजी आणि त्यापुर्वी मा.मुख्यमंत्री यांनी मानधन वाढीबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून निर्णय जाहीर करावा.
२) अंगणवाडी केंद्राच्या कामकाजासाठी नवीन आणि आधुनिक मोबाईल फोन पुरविण्यात यावेत.
३) मा.सुप्रिम आणि मा.धुळे कामगार न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीची (उपदान) रक्कम अदा करण्यात यावी.
४) सेवानिवृत्त आणि निधन झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभाची रक्कम त्वरित देण्यात यावी.
५) सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन लागू करण्यात यावी.
६) दि.९ जानेवारी २०२३ पूर्वी सेवेत असलेल्या मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना थेट नियुक्तीसाठी शिक्षणाची अट शिथिल करावी.
७) नागरी विभागातील अंगणवाडी केंद्राचे सुधारीत घरभाडे तातडीने लागू करण्यात यावे.
८) अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांचा सेवाकाळात मृत्यू झाल्यास कुटुंबातील पात्र व्यक्तीला नोकरीत सामावून घेण्यात यावे.
वरील मागण्या शासनाने दि.२२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत न सोडविल्यास दि.२३ फेब्रुवारी २०२३ पासून राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी संपूर्ण असहकार आंदोलन करणार आहेत.
या राज्यव्यापी आंदोलनात जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली भागिदारी करणार आहेत.
तरी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांनी १००% भागिदारी करत असहकार आंदोलन यशस्वी करावे.असे आवाहन श्रीमती मिनाक्षी चौधरी,पुष्पा परदेशी,मंगला नेवे, सुनंदा नेरकर,रेखा नेरकर,शकुंतला चौधरी,चेतना गवळी,आशा जाधव,सविता महाजन,सरला पाटील,शोभा जावरे,कल्पना जोशी,शुभांगी बोरसे,उज्वला पाटील,सुलोचना पाटील,निता सुरवाडे,संगिता निंभोरे,नंदा देवरे,साधना पाटील,वंदना पाटील,सुरेखा मोरे,सविता वाघ,ज्योती पाटील यांनी केले आहे.